बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

ब्रेक-अप

आज मी त्याच्याशी ब्रेक-अप  घेतला
घेतला म्हणजे घेतला
अगदी ठरवले म्हणजे ठरवले
कि  आता बस्स झाले

आधीपासून तसा  तो  होताच
पण आजकाल थोड्याथोड्या
गोष्टींवरूनही तो मला
छळायला लागला होता  

जीवन म्हटले  की चढ उतार येणारच
पण म्हणून   त्याने मला 
प्रत्येक टप्प्यावर का छळतच राहावे ?
त्याचे अस्तित्व  दाखवतच राहावे ???

आजकाल तर त्याच्यामुळे
बिपिचा त्रास व्हायला लागला होता
डॉक्टर म्हणाले आता चाळीशी आली
त्याला सोड नाहीतर कायमच्या  गोळ्या घ्याव्या लागतील

अन मग मधुमेह…… किडनी  फेल,
परा लिसिस ,ब्रेन हमरेज अन काय  काय
मग म्हटले  याचे लाड करणे 
आता  बस पुरे झाले

शांतीने जगायचे तर
याच्याशी  ब्रेक-अप केलेलाच बरा
अन सोडला त्याला आता
अगदी सोडला म्हणजे सोडला

त्याचे नावही घ्यावेसे वाटत नाही
पण कधी तो तुम्हालाही भेटला तरी
त्याला तुम्हीही तुमच्या जवळ फिरकू देऊ नका
तो तो म्हणजे मला छळणारा तणाव(Tension ) …………

 

शनिवार, २० जुलै, २०१३

पुनर्जन्म

पुनर्जन्म म्हणजे मेल्यानंतर 
पुन्हा जन्म असतो का मला माहित नाही
पण याच जन्मात मी लेकीच्या जन्मात 
माझा पुनर्जन्म अनुभवते आहे………

तिचा निरागस गोड चेहरा 
यात मी माझे हरवलेले बालपण शोधत असते 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बरेच काही राहून गेलेले आहे  
पण तिच्या रुपात आम्ही पुन्हा सुखाचे क्षण अनुभवतो…………. 

तिच्या  आयुष्याच्या प्रत्येक वळणाची
मी सावली होऊन तिच्यासोबत असते 
माझे हरवलेले क्षण ती भरभरून जगते तेव्हा 
माझे जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते……. 

तिच्या प्रत्येक यशाच्या पायरीसोबत 
माझ्या जीवनातील पराजय धुतला जातो 
अन मी पुन्हा पुन्हा नव्याने जगायला सिद्ध होते
एकाच जन्मात पुन्हा नव्याने जन्म घेते……  

तिचे रूप म्हणजे माझा अन तिच्या बाबांचा 
रूपाचा अन गुणांचा एकत्रित संगम 
आम्हा दोघांचे द्वैत जावून अद्वैताचा संगम  
आमच्या प्रेमाला परमेश्वराने दिलेली  देणगी  ……… 

खरंच परमेश्वर आहे हे तो 
प्रत्येक गोष्टीतून दाखवत असतो म्हणूनच  
तो आम्हाला आई बाबा बनवुन 
त्याचा  आम्ही अंश असल्याची प्रचिती देतो ……. 

माणूस खूप काही मिळवण्यासाठी धावत असतो
बाळ हवे म्हणून देवाकडे साकडे घालतो हरेक प्रयत्न करतो 
अन आयुष्याच्या एका टप्प्यावर तो आई किंवा बाबा होतो 
त्या ईश्वरीय अंशामुळे त्याला मातृ देव -पितृदेवाचा दर्जा मिळतो …

तो ईश्वरी अंश त्याच्या स्वतःपासून बनवून 
देवाने प्रत्येक सजीवावर किती मेहरबानी केली आहे
आपले बाळ प्रत्येकाला किती प्रिय असते 
कारण त्याला माहित असते कि याच्यामुळेच तर माझे जीवन आहे ………. 

नाहीतर मी जन्मलो वाढलो अन संपलो
मला काहीच अर्थ नाही 
कितीही धनसंपदा मिळवली तरी 
मी राहीन तरच याचा उपयोग…………… 

अन  बाळाच्या रूपाने 
मी जन्मोजन्मी जिवंत राहणार आहे
माझा मी पणा जपला जाणार आहे 
म्हणून मला मातृ-पितृदेव भव च्या जोडीला  कन्या-पुत्रदेव भव म्हणावेसे वाटते…….

मंगळवार, ११ जून, २०१३

नातीगोती

नातीगोती हवीहवीशी 
अन कधी नकोनकोशी 
ज्याच्याकडे  पैसा… सत्ता 
तो श्रेष्ठ  दर्जाचा बाकीचे  आपले नेहमीच नुसता गोतावळा 

पण  त्या गोतावळ्यातही 
प्रत्येकाला स्वतःचा  चेहरा असतो 
तोही आपली ओळख 
आपल्या परीने शोधतच  असतो 

श्रेष्ठ दर्जाचा म्हणवणारा
नातेवाईक कधी  पैशाने दाबतो 
तर कधी नात्याने दाबतो 
पण  मोठेपणाच्या अहंकारात तो बरोबरच असतो 


त्याची प्रत्येक कृती योग्य असते 
कारण तो मोठा असतो अन 
गोतावळ्यातला धडपडणारा होतकरू 
त्याचा हक्काचा  गुलाम असतो 

श्रमाची,हमालीची, मेहनतीची 
सगळी कामे त्याने करायची 
कारण त्याच्याकडे काय आहे 
इतके तर त्याने केलेच पाहीजे 

पैशावाला तो कधी
मोठा भाऊ कधी बहीणही असते 
नात्याचं मोठेपण त्यांना 
आयुष्यभर  मिरवायचे असते  

मोठेपण म्हणजे काय हे 
ते बरेचदा विसरतात 
अन लहानांनी लहानच राहावे
या हट्टाने  मग निसर्गतःच मिळालेले मोठेपण ते स्वतःच गमावतात  



  

म्हातारपण

म्हातारपण किती मुश्किल आहे
त्यांना वाटतेय आता यांना फक्त
दोन वेळच्या अन्नाची अन
औषधाचीच आता गरज आहे

आपण  नकोसे असणे
किती जीवघेणे असते
मरणयातना म्हणजे काय
हे अनुभवने असते

हो आम्ही जगलो वाढलो
अन म्तातारेही झालो
आता शरीर साथ देईनासे झाले
तर  जगण्यास का नालायक झालो???????

बालपण ते  प्रौढपण संपले
अन म्हातारपण सुरु झाले
पण म्हणून काय आमचे
आता जगणेच संपले  ???????

यांचे जिवंत असूनही
आम्हाला काय उपयोग आहे
हि नजरच जिवंत असतानाही
पुन्हा पुन्हा  मारत असते

तुम्हाला समजत नाही ….  
कळत नाही अक्कल  नाही …….
निट  राहा नाही तर जा दुसरयाकडे
हे जा जा काळजाला घरे पाडतात

त्यांच्या सणाला सुट्टीला
आमची  अडचण होते
अन हि अडगळ समजुन
माळया माळयावरून भिरकावली जाते

आता दिवस…महिने …वर्ष
हे चालूच  राहणार आहे
आमच्या अंतसमयीच का हे
आता सारे संपणार  आहे ??????????



गुरुवार, ९ मे, २०१३

अजूनही मी एकटाच


सांगायला तर ते आई बाबा होते
रथाची ती दोन चाके मात्र नेहमी एकमेकांचे 
विरूद्धच धावत होती अन
आम्हा पाखरांचे नशिबी फक्त हिंदकळणेच होते  

स्वर्गातली त्यांची गाठ 
पृथ्वीवर नेहमीच उलटी होती 
त्यांचे नेहमीचेच युद्ध वार मात्र
आम्हीच झेलत होतो 

दोधांच्या वागयुद्धाला 
घरचीच रणभूमी मिळाली होती
हरनाऱ्यालाही शस्त्र चालवायला 
आमची पाठ मात्र नेहमी हक्काची होती

दिवस बदलले, बदलले वारे 
प्रत्येक गोष्टीला मोहताज मी 
माझ्या कष्टाचे चीज झाले 
सर्व भौतिक सुख घरात आले 

माझ्या एकट्याचीही 
सुंदर चौकट झाली 
आता मात्र दोघांचेही एकमत आहे 
दोघांच्याही कष्टांमुळे???? माझे हे यश आहे 

आज मी भौतिक जगात यशस्वी अन सुखी? आहे 
मुलांसोबत आईबाबांचाही पालनकर्ता आहे 
जे हवे ते मिळवण्याची हिम्मत आहे 
असे सगळ्यांनाच वाटत आहे 

पण माझं होरपळलेले बालपण,तारुण्य
मी.....अजूनही एकटाच आहे 
कितीही अट्टाहास केला तरीही,
कितीही कष्ट केले तरीही मिळेल काहो मला ते निरागस,निर्मळ कोमल बालपण ......................
by Manaswi

बुधवार, ८ मे, २०१३

मी असा......मी तसा


जीवन जगताना बाहेरून कसेही वागलो तरीही 

अंतर्मनात एक द्वंद नेहमीच चालू असते 
ऐहिक जगात जिंकण्याच्याच उर्मीने जगणारे आम्ही 
आतमध्ये मात्र स्वतःला चांगलेच ओळखून असतो 

महागाई,बेकारी ,भ्रष्टाचार,बलात्कार 
सगळ्यावरच आम्ही पोटतिडकीने टिपण्या देतो
पण आतमध्ये डोकावून पहिले तर जाणवतं 
खरंच का टिपन्यांच्या एक टक्का तरी आम्ही जगतो ?

कधी कधी वाटते कशासाठी हा अट्टाहास 
आहोत तसेच व्यक्त व्हावे 
अन नंतर काय होईल ते पाहून घ्यावे
जे होईल त्याला सामोरे जावे  

पण स्वार्थीजीव तसे वागू देईल तर शपथ्थ 
क्षणभंगुर आयुष्याचे वाटेकरी आम्ही 
अमर असल्याप्रमाणे जगत असतो म्हणूनच तर
शेवटच्या क्षणापर्यंत मी असा मी तसा चा नारा चालूच असतो.

रविवार, ७ एप्रिल, २०१३

जगतच राहावे..........

संथ आयुष्य जगताना 
आताशा मला कंटाळा आलाय 
असे वाटते सरळसोट मार्ग सोडून 
जरा आड वाटेने चालत सुटावे 

त्या आडवाटेलाही खूप फाटे असावेत
कोणत्याही वाटेने जावे 
प्रत्येक वाटेवरून जाताना फक्त 
जीवन जीवन अन जीवनच जगावे

खूप जगले आतापर्यंत स्वतःसाठी
आता दुसार्यान्साठीही जागून पाहावे
प्रत्येक गोष्टीत फायदा बघणारी मी 
फक्त सुख सुख अन सुख अनुभवावे

हात रक्तबंबाळ होईपर्यंत 
दुसर्याच्या वाटेतील काटे उचलतच राहावे 
जीवनाच्या अंतापर्यंत 
बस फक्त जगतच राहावे..........

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

विस्कटलेलं आयुष्य

लाखात एक देखणी अशी बाला
पाहून तिच्या रुपाला
सगळेच म्हणत लग्नाची चिंता कशाला
वाटेवरचा चोरही उचलून नेईल तिला

खरंच अघटीत घडलं
वाटेवरच्या चोरानेच उचलून नेलं
तीन मुलं होईपर्यंत
रूपाच्या तिचं खोबरं  झालं

अन एक दिवस नको तेच झालं
बाहेरचा रस्ता दाखवला नवारयाने
काखेत तीन उपाशी लेकरं
फिरत राहिली अनवाणी पायाने अन रिकाम्या हाताने

गणगोत सारं कधीच संपलं होतं
सगळं आभाळच आता फाटलं होतं
जगणं आता तिचं संपलं होतं
नशिबी फक्त मुलांसाठी कष्टनं उरलं होतं

पण ती  हरली नाही मोडली नाही
उसंत अशी तिनं घेतलीच नाही
मुलांशिवाय काही असतं हेच ती विसरली
त्यांच्यासाठीच फक्त कष्टत राहिली

केसं हि गजर मळायला असतात
वस्त्र हि कधीतरी स्वतःला नटवायलाही असतात
हसणं नटणं मुरडणं हे ही  असतं
हे सारंच  ती विसरली होती

जिभेवर तलवार नजर घारीची
चाल वाघिणीची हिंम्मत मर्दाची
यात मात्र तिचं बाईपण हरवुन गेलं
तीच मीपण सारं संपूनच गेलं

मुलही तिची कर्तबगार निघाली
स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी
तिच्या आईपणाचा आदर राखणारी
तिच्या सुखासाठी आता झटणारी

पण तिचं सारं तरुण्य प्रौढत्व
कारुण्याची झालर लेउनच जगलं
त्याचे व्रण वृधत्वावरही घाला घालताहेत
आता तिला सुखाचे लेपही नकोसे वाटताहेत

विस्कटलेले आयुष्य आता जोड म्हणताही
जोडले जात नाही
सुखाचा प्याला जवळ असून पी म्हणूनही
आता पिता येत नाही

शरीराचे रोग औषधाने बरे करता येतात
पण हृदयाच्या जखमा कधीच भरता येत नाहीत
मन उध्वस्त करण्याचे काम मात्र त्या चोख बजावतात
अन दुभंगलेपानाचे  विकार कायमचे जडवून जातात

शनिवार, ३० मार्च, २०१३

मी कोण ?

आई बाबा तुमच्या वंशाचा दिवा म्हणून
किती लाड केलेत माझे
बंदूक घोडा सगळे आणून दिलेत मला
पण मी मात्र नेहमी बाहुलीतच रमलो 
  
तारुण्याच्या उंबरठ्यावर मिसरूड फुटले  
पण हे काय माझे मन आतून वेगळेच मोहरले
मर्दमित्रा,चिकण्या शब्दांनी मित्रांनी स्पर्श केला कि
वेगळीच अनुभती अंतरंगात उमटायची 


मी कोण मी कोण हे काय मन आक्रांदायच
कुणाशी बोलू कुणाला सांगू
देवा मनाचा अन शरीराचा ताळमेळच बसत नाही
जीवन हवंय पण हे शरीर का नकोय


जग वेगळं पण स्वप्न वेगळीच पडायची
भास आभासाच्या दुनियेत मी एकटाच फिरायचो
कसलं वादळ  कसलं काहूर माजलं?
कोण सांगेलकोण समजावेल  


अन एक दिवस जहर ओतलं  मित्रांनी
काय रे नामर्द आहेस का
मी काय ऐकतोयमी कोण आहे
वावटळीत मी एकटाच भिरभिरतोय    


अन एक दिवस समजले  
निसर्गाने चूक केली  
विज्ञानाने त्याला केमिकल लोच्या म्हटलं 
बाईचं मन पुरुषाच्या शरीरात अडकवलं    


देवा जीवन तर मला जगायचेय  
पण मी कोण माझे अस्तित्व काय
माझा जन्म कशासाठी 
मी कुणासाठी  अन कोण माझ्यासाठी   


किड्या मुंगीच्याही जीवनात काही अर्थ असतो  
गुन्हा केला तरी सजेनंतर गुन्हा माफ असतो  
पण मी काय गुन्हा केलाय
माझ्या जीवनाचा सारीपाट कसा आवरणार  


मानसा तू तर असे नियम बनवलेत कि  
मी कुठेच  बसत नाही  
अरे जनगणनेतहि आम्ही खूप झगडलो तेव्हा
इतर म्हणून तरी आलो    


नोकरीतही मला आरक्षण नाही  
तिथेही फक्त तो अन तीच      
जगण्याचे सगळे रस्ते तुम्ही बंद केलेत 
तरीही तुम्ही मात्र मानव मग मी कोण?   


मी कोण या वावटळीत 
सगळं गणगोत मित्र परिवार दूर झाला 
काल पर्यंतच्या ओळखीच्या नजराही 
आता परक्या झाल्या ...........परक्या झाल्या ..




.. 

गुरुवार, २१ मार्च, २०१३

तिचं भरभरून जगणं

तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पहिल्या कि जाणवते 
आयुष्यभर फक्त प्रेमच वाटल्याच्या त्या पाऊलखुणा आहेत
तिच्यासोबत थोडाही वेळ घालवला तर 
प्रत्येकालाच असे जाणवते कि आई हि अशीच असते 

सुट्टीत गावाकडे येणारी तिची मुलं नातवंड
सगळ्या सणांहून ते दिवस तिच्यासाठी महत्वाचे असतात
तिच्या कुडीत तेव्हा हत्तीचं बळ  येतं 
सगळ्यांसाठी काय काय करू असं तिला होऊन जातं 

तिच्या प्रत्येक लेकराला काय काय आवडतं 
ते ते सारं  तिनं साठवून ठेवलेलं असतं
लेकरं  तिची मोठी झालीत तरीही  
बालपणीच्या सगळ्या  आवडी जपल्या जातात.

मुंबईच्या नातवंडानाही ती तिच्या विश्वात
अलगद घेऊन जाते
गोठ्यातल्या जनावरांच्या शेनकटलेल्या पाठीवरून
तोंडावरून हात फिरावत त्त्यांचे किती गुणगान गाते 

नातवंडांना ती जेव्हा शेतात नेते 
तिची रानाची झाडं झुडपं अन काळी मातीही 
किती सहजतेतेने ती त्यांचे गुणगान गाते 
इतक्या दिवसांनी जाऊनही ओळखतात मग तेही

तिच्या शेताची नासधूस करणारी वानरं  अन सांबरं 
भल्ली दंगा  करतात वो ..पण काय करतील 
त्याहिले पण खायाले न प्यायले पाणी पाहिजे 
म्हणत त्यांचे अस्तित्वही प्रेमाने स्वीकारते 

आम्ही धान्य निवडताना 
खड्यातूनही तिचं दाने टिपणं 
कष्टकर्याला दाण्यादाण्याची असलेली  किंमत 
न बोलताही सांगून जाणं 

विदर्भाच्या तापत्या उन्हाळ्यातही 
तिन्हीसांजेला चुलीवरच्या मडक्यावर ती 
मांडे भाजते अन आम्हा सुनांना सांगते 
शिकून घ्या न पोरीहो माह्या लेकराले मांडे लई आवडतात 

मला आठवते माझ्या अपघातात 
तिचं विना रिझर्वेशन धावत येणं 
काय झाला माय  वो म्हणत कुशीत घेणं 
बरं होईपर्यंत थकल्या हाताने सगळं करणं 

बरं  झालं माय व  देवानं एकच फळ दिलं तर
लेकच दिली तुला कारण  एकतरी माय भैण पाहिजेच
पाठीपोटावरून हात फिरवायला
जगण्याची नवी दृष्टी देऊन जाते

तिचं मुंबईत आल्यानंतर तिला 
विचारलंच कुणी आजी करमते का तुम्हाला 
तर का नाही बाप्पा जिथं आपली लेकरं तीच आपली जन्नत 
हि वाक्य खूप काही शिकवून जातात 

ती कधीच तत्वाज्ञान सांगत नाही
पण तिचं भरभरून जगणं  
जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जाते 
नकळत पुढच्या पिढीलाही सुसंस्कारित बनवून जाते.

सोमवार, १८ मार्च, २०१३

मातीतले आम्ही

करपली पिकं सारी 
न्हाई जनावराले चारा 
जीव वारा हुरी व्हतो
पाहून रानच्या पाखरा 

व्हते अंगाची काहिल 
आटला गावचा पाणवठा 
न्हाई खायाले भाकर 
जीव झाला ग नकोसा 

माही लेकरं न गाय 
चार बकर्या न मोती वाघ 
कसं तगवु ग  त्याहिले
झोपडं ग माझं खाली सारं 

केला देवाले नवस 
हात जोडीले सायबाले
पाया पडले सरकारचे
भिक मागितली सावकाराले 

माही काळी माय 
भेगाळला ग जीव तिचा
आम्हीही आता किती दिस तगणार 
का जावू असेच संपून........
मातीतले आम्ही आमच्याच मातीत............ 

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

लढ मित्रा

लढ मित्रा लढ म्हणायला 
माझे काय जाते आहे? 
कारण शिवाजी जन्माला यावा 
पण बाजूच्या घरात अशा समाजातले आम्ही 
मित्रा तू अधिकारी असलास तरीही 
सरकारी नोकरच आहेस 
पण परिघात राहूनही तू 
संविधानाची ढाल घेऊन लढतोच आहेस 
शह काटशहच्या राजकारणात तू 
नियम अधिनियमांच्या बरोबर चालतोस
कितीही शह काटशह दिले तरीही 
शेवटी तूच बरोबर असतोस 
तू ज्याही विभागात जातोस
तिथे खूप छान बदल होतात
तू तिथेही जास्त टिकत नाहीस
बदलांच्या वाऱ्यात नवा विभाग तुझ्यासाठी तयारच ठेवतात
तू हरत नाहीस थकत नाहीस 
मिठाला जागून तू तिथेही राबतोस 
जुन्या खोडांचा श्वास गुदमरला की 
पुन्हा प्रशासकीय कामाचा भाग म्हणून दुसऱ्या विभागात जातोस
असे नाही कि प्रत्येक वेळी खळखळ होतच नाही 
चार दिवस निषेध बोर्ड लागतात
पेपरातही तीव्र नाराजीच्या बातम्या येतात
पुन्हा वादळ थांबून सगळे शांत होतात
पण मित्रा तुला थांबायला वेळ कुठे आहे?
आम्ही मात्र बातमी दाखवत हा आमचा मित्र म्हणवतो
तू कसा लढतोस याच्या कहाण्या ऐकवतो 
अन तुला लढ मित्रा लढ म्हणतो
आज आम्ही कॉमनमेनच्या नावाखाली
निष्क्रिय आयुष्य जगत आहोत 
तुला मात्र लढ म्हणताना 
स्वतःची कातडी वाचवत जगत आहोत.

मंगळवार, ५ मार्च, २०१३

आयुष्याच्या वळणावर

आयुष्याच्या वळणावर 
धडपडत चालताना
 धडपडता धडपडता
कधीतरी आपटतो जीव
खूप लागलं तर नाही ना
पाहत पुन्हा चालू पडतो
वाटेत सतत खाचखळगे 
अडचणी येताच राहतात 
पण चालणं कधी 
थांबत का ?
आयुष्याच्या शेवटच्या 
क्षणापर्यंत चालतच राहायचे  असते 
अडखळत धडपडत पाऊल 
नेहमी पुढेच टाकायचे असते 
आयुष्य जगताना कितीही दुखः आली तरी 
स्वप्न पाहणे का सोडायचे असते 
जीवन जगताना मरणांतिक वेदना मिळाल्या 
तरीही जगणे का सोडायचे असते .......


आई

मी आई झाले तरीही 
अजूनही आई शोधते आहे 
लेकीची स्वप्न जपतानाही 
माझ्या स्वप्नांचा शोध चालूच आहे 

माझ्या पिढीला  शिकवलं 
मातृ देव भव पितृ देव भव 
पण का नाही शिकवलं
मुलांमुळेच तुम्ही  मातृ देव भव पितृ देव भव 

जन्म देऊन उपकार केलेत तुझ्यावर 
या ओझ्याखालीच जन्म माझा चालला
उपकारांचे ओझे फेडता फेडता 
जीव मेटाकुटीस आला 

आई जन्माबरोबर संवेदनाही आहेत ग मला 
प्रत्येक कर्तव्य पार पाडताना 
एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून 
जगायचेय ग मला 

तुमच्या दृष्टीने तुम्ही बराबर असाल
परंतु माझ्या परीने मीही बरोबरच आहे
कुणालाही न दुखावता 
स्वतःचे अस्तित्व जपायाचेय मला 

पण भिती वाटते तुमचे संस्कार माझ्यात येउन 
जेव्हा माझे शरीरही गलितगात्र होईल 
लेकीलाही उपकार फेड म्हणून 
मला तगवण्यास तिचेही पंख छाटत राहील....................... 
    By Manaswi